
शहरातील शिवाजी पुतळ्याजवळ मूक आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
नांदेड : मराठा समाजाने ५८ मोर्चे काढून समाजाच्या भावना व्यक्त केल्या असून आजपर्यंत आम्हीही बोललो आहोत, आता लोकप्रतिनिधींनी समाजासाठी काय केले, हे सांगण्याची वेळ आली आहे. केंद्र व राज्य सरकाकडून आरक्षणाबाबत टोलवा-टोलवी केली जात आहे, उपसमितीच्या अध्यक्षांनी समाजाची दिशाभूल करू नये, असा टोला छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव न घेता लगावाला. नांदेड येथे सकल मराठा समाज व विविध संघटनांच्या वतीने आयोजित मूक आंदोलनात ते बोलत होते. शहरातील शिवाजी पुतळ्याजवळ मूक आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती खा.संभाजीराजे म्हणाले,की १०२ व्या घटनादुरुस्तीनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे, असे केंद्र सरकारकडून सांगितले जात आहे. मात्र राज्य सरकारकडून याबाबत कोणतीच पावले उचलली जात नाहीत. केंद्र सरकारने आरक्षणाची ५० टक्केची मर्यादा वाढवावी, अशी मागणी राज्य सरकार करत असून केंद्र व राज्य सरकारच्या भांडणाशी समाजाचे काहीही देणे घेणे नाही, आरक्षण कसे देता, यावर केंद्र व राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी असे ते या वेळी म्हणाले.
मराठा आरक्षणाबाबत मला संसदेत बोलू दिले नसते, तर मी खासदारकी सोडली असती, असे सांगत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आरक्षणासाठी आपण हा लढा लढत आहोत, हे स्पष्ट केले. राज्य सरकारने मराठा समाज सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्टय़ा मागास आहे, हे अगोदर सिध्द करावे, तर केंद्र सरकारने ५० टक्केची मर्यादा वाढवावी असे ते या वेळी म्हणाले. नुसते एकमेकांकडे बोट दाखवून भागणार नाही, राज्य व केंद्र सरकारने आपआपली जबाबदारी पार पाडून गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे, अशी मागणी त्यांनी या वेळी केली.
१५ जुलै रोजी राज्य शासनाने एक अध्यादेश काढला असून २०१४ साली ज्या लोकांना नियुक्त्या दिल्या आहेत त्यांना सेवेत रूजू करून घ्यावे, असे या आदेशात म्हटले आहे. यासाठी जात प्रमाणपत्राची पडताळणी आवश्यक असून आता आरक्षण रद्द झाले आहे, त्यामुळे या लोकांना नोकरीत रूजू करता येणार नाही, असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. हा सरळ सरळ अन्याय असून हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही, असे या वेळी छत्रपती संभाजीराजे म्हणाले.
या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ पानी पत्र मला पाठविले असून या पत्रात अनेक तफावती आहेत, त्यामुळे हे पत्र आपण नाकारत आहोत, असे ते या वेळी म्हणाले. कोल्हापूर, नाशिक येथील आंदोलनाच्यावेळी तेथील पालकमंत्री, सर्व लोकप्रतिनिधी आले होते. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनीही आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे, मग येथील पालकमंत्री आंदोलनास का आले नाहीत, त्यांना येथे यायला वेळ नाही का, असे म्हणत छत्रपती संभाजीराजे यांनी पालकमंत्र्यांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
पालकमंत्र्यांनी पाठ फिरवली
मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या मूक आंदोलनाकडे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पाठ फिरवली. भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर, शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील, आ.राम पाटील रातोळीकर, आ.डॉ.तुषार राठोड, आ.भीमराव केराम, आ.बालाजी कल्याणकर, आ.मोहन हंबर्डे, आ.माधवराव जवळगावकर आदींची उपस्थिती होती.
नांदेडच्या सुपुत्राला मला भेटण्यास वेळ नाही
उपसमितीचे अध्यक्ष असणाऱ्या नांदेडच्या सुपुत्राने दिल्लीत काँग्रेस, शिवसेनेच्या तसेच अन्य पक्षांच्या खासदारांच्या भेटी घेतल्या, त्यांना मला भेटण्यास वेळ नाही, असे म्हणत खा.छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या कार्यपध्दतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
भाजपकडून खासदार संभाजीराजेंचा गैरवापर
आरक्षणाच्या ५० टक्क्यांच्या मर्यादेवरून भाजप उघडा पडला आहे. मराठा समाजालाही ही बाब कळाली आहे. त्यामुळे खासदार संभाजीराजे यांच्या आडून डागाळलेली प्रतिमा सुधारण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. खासदार संभाजीराजे मराठा समाजासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारे भाजपमधील एकमेव नेते आहेत. त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या वैयक्तिक टीकेला मी उत्तर देणार नाही असे सांगत अशोक चव्हाण यांनी भाजपकडून त्यांचा गैरवापर करत असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे. नांदेड आंदोलनास भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. मराठा संघटनातील कार्यकर्ते नव्हते असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.