
आशिष शेलार यांचा घणाघात!
मुंबईत शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते आमने-सामने आले असून तुफान राडा झाला आहे.
मुंबईत शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते आमने-सामने आले असून तुफान राडा झाला आहे. अयोध्येतील राम मंदिर उभारणीच्या कामात जमीन खरेदीबाबत भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला असून यावरुन शिवसेनेने भाजपावर केलेल्या टीकेमुळे भाजपा संतापली आहे. या मुद्यावरूनच आज शिवसेना भवनसमोर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त हाणामारी झाली. यानंतर माहीम पोलीस स्टेशनला पोहचल्यानंतर भाजपा नेते आशिष शेलार यांनी या प्रकरणावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना, “ या आंदोलनानंतर आंदोलक अटक होऊन गेल्यानंतर लपूनछपून, पोलिसांच्या आड राहून एका महिलेवर हल्ला करणं. यातून शिवसेनेने आपली औरंगजेबी वृत्ती दाखवलेली आहे.” असं म्हणत शिवसेनेवर घणाघात केला आहे.
दरम्यान, शिवसेना भवनासमोर झालेल्या तुफान हाणामारीनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. पोलिसांनी भाजपा जनता युवा मोर्चाच्या जवळपास ४० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. शिवसेनेच्याही काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं आहे.
याबाबत प्रतिक्रिया आशिष शेलार म्हणाले की, “ ज्यावेळी सोनिया गांधी, रॉबर्ट वढेरा देव बनतात, त्यावेळी तेंडुलकर, साठे आणि आंबेडकर हे दुष्मन शिवसेनेचे होतात. हे आज या ठिकाणी दिसलं आहे. त्यामुळे या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. लपून पोलिसांच्या आड राहून हल्ले कसले करता? रणांगणात समोर या, भाजपा तुम्हाला चारही मुंड्या चीत करायलाय तयार आहे. त्यामुळे या भ्याड हल्ल्याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे. एक महिला अक्षदा तेंडुलकर नावाची तिच्यावर सर्वांनी मिळून हल्ला करणं, शिवसेनेने आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली आहे, याचं उत्तर … हिंदीत एक म्हण आहे, लातो के भूत बातो से नही मानते.. इसके आगे बातोंसे नही चलेंगे उनको उनकी भाषां मै ही जवाब देंगे..”
तसेच, “ मी व मंगलप्रभात लोढा आम्ही सगळेजण पोलिसांना भेटलो आहोत. पोलिसांनी निष्पक्षपणे काम करावं ही अपेक्षा आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करणं अपेक्षित आहे. आज पोलीस आम्हाला म्हणाले आहेत की, गुन्हा दाखल करत आहोत. तो गुन्हा दाखल केला नाही. तर हे आंदोलन अजून वाढेल, पोलिसांनी तसं आम्हाला आश्वासन दिलं आहे.” अशी देखील यावेळी शेलार यांनी माहिती दिली.
यावेळी शेलार असं देखील म्हणाले की, “आम्हाला अजूनही एक कारण कळत नाही की, राम मंदिराच्या मुद्यावरून शिवसेनेच्या पोटात काय दुखतं आहे? ” देखो दिवानो ऐसा काम न करो, राम का नाम बदनाम ना करो.” शिवसेना पहिल्या दिवसापासून राम मंदिराच्या विषयात…पहिले मंदिर नंतर सरकार म्हणाले, मात्र मंदिर विसरले. त्यानंतर समर्पण निधी गोळा करण्याचा कार्यक्रम आम्ही केला. त्याला लोकवर्गणी करून बदनाम करण्याचे अग्रलेख त्यांनी लिहिले आणि आज ज्या समर्पण निधीतून पारदर्शक पद्धतीने कारभार सुरू आहे. त्यावेळी राम मंदिराच्या निर्मितीला बदनाम करण्याचं काम सुरू आहे. रामाला बदनाम करण्याचं व राम मंदिराला बदनाम करण्याचं षडयंत्र हे लोकं जे करत आहेत, हे पाप जनतेने पाहिलं आहे. म्हणून राम को बदनाम मत करो, एवढाच आमचा शिवसेनेला सल्ला आहे.”
नेमकं काय झालं –
अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने (ट्रस्ट) केलेल्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरुन शिवसेनेकडून टीका करण्यात आली होती. शिवसेनेकडून घेण्यात आलेल्या भूमिकेविरोधात भाजपा जनता युवा मोर्चाकडून शिवसेना भवनच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं. दरम्यान शिवसेना भवनच्या बाहेर भाजपाचं आंदोलन सुरु असल्याची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात शिवसेना कार्यकर्ते तिथे दाखल झाले. यादरम्यान शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते आमने-सामने आले आणि तुफान हाणामारी झाली. दरम्यान हाणामारीमुळे परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती.